गिरगाव आणि ती
गिरगाव आणि ती आज सकाळी दुपारच्या जेवणासाठी तोंडली चिरताना तिची आठवण झाली. तारखेकडे सहज लक्ष गेले तेव्हा जाणवलं की तिला जाऊन आज बरोबर एक महिना झाला सुद्धा. तिच्यासारख्या काचऱ्या काही मला जमत नाहीत. मलाच काय कोणालाही जमत नाहीत, जमणारही नाहीत. भेंडीच्या भाजीचं ही तसच. इतकं बारीक चिरायला कसं काय जमायचं कोणास ठाऊक? आणि चव वर्षानुवर्षे तशीच. आंबेमोहोर भाताचा वास आणि गरम गरम आमटी हे माझ्या तिच्याकडच्या सुट्टीत असलेला हायपॉईंट. आणि चिवडा इतकं चविष्ट असायचा की किती ही खाल्ला तरी कमीच पडायचा मला. मे महिन्यात आंब्याच्या पेट्या घेऊन भय्ये यायचे गिरगाव च्या चाळीत. तेव्हा शेजारची शोभा बेन आणि ही तासंतास त्याच्याशी घासाघीस घालत बसायच्या आणि शेवटी एकदाचा भाव झाला की दोन पेट्या ठेऊन जायचा तो. मग काय आमची चंगळ. आमरस, पन्ह, मँगो मिल्कशेक, मँगो केक, आंबा वडी एक ना दोन असा रतिबच लागायचा. मग कधी राणीच्या बागेची सफर, कधी म्हातारीचा बूट, कधी मत्सालय, कधी चौपाटी, तिकडे भेळ पुरी, घोड्या गाडीत बसून केलेली धम्माल नेहमीच लक्षात राहील. सुट्टीत एक तरी मराठी किंवा हिंदी चित्रपट पाहायला जायचोच सगळे. गणपती मध्ये तर चाळ...